राज्यात ६० हजार अनधिकृत स्कूल बस   

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची धक्कादायक माहिती

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात सध्या अधिकृतपणे ४० हजार स्कूल बस रस्त्यावर धावत आहे. दुसरीकडे, सुमारे ५० ते ६० हजार बस अनधिकृतपणे धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची शाळेतून ने-आण करत असल्याची तक्रार स्कूल बस चालक-मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनीच केली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत लवकरच स्कूल बसेसच्या नियमावलीत सुधारणा करणार असल्याची माहिती देतानाच अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसेसवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
 
सरनाईक यांच्या  अध्यक्षतेखाली गुरुवारी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. परिवहन विभागानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य दिले असून यासाठी स्कूल बसेसच्या नियमावलीत आवश्यक सुधारणा  केल्या जातील. वाहनचालकांनी या नियमांचे काटेकोरपण पालन करावे, असा इशारा देतानाच नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचाही विचार केला जाईल, असेही सरनाईक यावेळी म्हणाले. 

Related Articles